Vehicle Fine : बेशिस्त वाहनधारकांकडे १३६ कोटींचा दंड थकीत;सहा महिन्यांत ३० कोटी रुपयांची भर
![Image](https://media.assettype.com/esakal/2024-06/9f5bc13d-a1aa-485e-b45c-7cdcde89c03b/Rushikesh_Salvi__60_.jpg)
नागपूर : वाहतूक पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर नागरिकांना विभागाद्वारे ऑनलाइन चालान पाठविले जाते. मात्र, हा दंड भरण्याकडे नागरिकांडून कानाडोळा करतात. त्यातूनच गेल्या पाच वर्षांत नागरिकांवर १३६ कोटी रुपये दंडाचे थकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत ५ लाख ८८ हजार ६२३ चालान कारवाईपैकी ३४ कोटी रुपयांचा दंड अद्यापही वाहनधारकांनी भरलेला नाही. शहरात वाहतुकीच्या नियमांतर्गत वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, सीटबेल्ट न लावणे, काळ्या काचा, नियमबाह्य सायलेन्सर, प्रवेशबंदी असतानाही प्रवेश, विरुद्घ दिशेने वाहन चालविणे आदी प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करीत चालानच्या माध्यमातून दंड लावला जातो. या दंडाची प्रत वाहन मालकाच्या मोबाइलवर पाठविण्यात येते. बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला खरा, मात्र दंड वसूल न झाल्याने या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोबतच वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. असे असताना चालकांकडून चालान भरण्यात बराच विलंब केला जातो. गेल्या सहा महिन्यांत ५ लाख ८८ हजार ६२३ जणांनी बेशिस्त वाहतूक केल्याने त्यांच्यावर दंड आकारण्यात आला. मात्र, त्यापैकी ५९ हजार २७५ नागरिकांनी दंड भरलेला असून ५ लाख २२ हजार २५० नागरिकांनी अद्यापही दंडाची रक्कम भरलेली नाही. अशाप्रकारे गेल्या पाच वर्षांत २४ लाख ६१ हजार २१७ नागरिकांनी अद्याप दंडाची रक्कम भरलेली नसल्याचे दिसून येते. याचा फटका सरकारला बसल्याचे दिसते. सव्वा तीन लाख प्रकरणे न्यायालयात दंडाची रक्कम नागरिकांकडून न भरल्यास ते प्रकरण न्यायालयाकडे पाठविण्यात येते. गेल्या पाच वर्षांत ३ लाख ३६ हजार ६२३ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आलेली आहे. विशेष त्यातून नागरिकांना नोटीस गेल्यावरही ती रक्कम भरण्यात येत नसल्याचे दिसून येते. अखेर लोकअदालतीमध्ये ती रक्कम ‘सेटल’ करून भरण्यावर अनेकांना भर असतो.
0 Comments